भरधाव कारने चौघांना 100 फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू तर चार जखमी.

बीड : भरधाव वेगात असलेल्या कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार जणांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार तर रस्त्यावरील दोन जण आणि कारमधील दोन जण असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा भीषण अपघात काल रात्री 9:30 च्या सुमारास बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील घाटनांदूरमध्ये झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9: 30 च्या सुमारास ही कार भरधाव वेगाने अंबाजोगाई हून घाटनांदूरकडे जात होती. याचदरम्यान कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चार जणांना धडक दिली.

आणि कारने त्या चार जणांना सुमारे 100 मीटर अंतर फरफटत नेले. यामध्ये वैभव सतीश गिरी वय 28, लहू बबन काटुळे वय 30 हे दोघे जागीच ठार झाले. तर रमेश विठ्ठल फुलारी वय 47, उद्धव निवृत्ती दोडतले वय 50 आणि कार मध्ये बसलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. ही कार इतक्या वेगात होती, की कारच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला आहे. दरम्यान दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!