दोन लाख रुपये देऊन लग्न केलं; अन् नवरी निघाली दोन लेकरांची आई.

नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नववधू पैसे आणि दागिणे घेऊन पळल्याची घटना उघडकीस आली होती.

अशीच घटना बीड जिल्ह्यात समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यामधील तळणेवाडी येथील रहिवासी कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) याने औरंगाबाद मधील एका मुलीचं स्थळ आणलं.

नवरी रेखा चौधरी व इतर चार जणांनी तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये देत असाल, तर आम्ही लग्नास तयार आहोत, अशी अट घातली. त्यानुसार वधू कडील मंडळींना नगद ६० हजार रुपये व १ लाख ४० हजारांचा धनादेश वरा कडील मंडळींनी दिला.

हा व्यवहार झाल्यानंतर गेवराई तालुक्यामधील बोरी पिंपळगाव फाट्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयामध्ये २० जुलै २०२१ रोजी त्यांचा लग्न सोहळा पार पडला. वधू कडील मंडळींना दिलेला धनादेश आठ दिवसांत विड्रॉल केल्यानंतर नववधू रेखा ही माहेरी गेली. त्यानंतर प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणं देत ती येण्याचे नाव घेत नव्हती. काही दिवस झाल्यानंतर रेखाचा मोबाईल ऑफ दाखवू लागला.

त्याचबरोबर तिचा विवाह आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीबरोबर झाला असल्याचं समोर आलं असून त्यांना दोन अपत्य देखील असल्याचं मुलाच्या कुटुंबातील लोकांना कळल्यावर त्यांना धक्काच बसला.

व आपली झालेली फसवणूक लक्षात आल्यावर त्यांनी रेखाचे स्थळ आणणाऱ्या रामकिसन जगन्नाथ तापडिया याला संपर्क साधला असता त्याने ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कोठे फिर्याद द्यायची ते करा’, म्हणत फोन कट केला.

याप्रकरणी मुलगा कृष्णा फरताळे याच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनीता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी (तिघे रा.जाधववाडी औरंगाबाद सिडको), रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) व विठ्ठल किसन पवार (रा.सावरखेडा, गंगापूर, औरंगाबाद) या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यामध्ये कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!