शेतकऱ्यांकरीता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केरळ आणि अंदमान निकोबारमध्ये दिनांक 26 मे 2022 रोजी माॅन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. पण, येत्या 48 तासांमध्ये माॅन्सून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले ‘असनी’ चक्रीवादळ आता शांत होत असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले असून त्यामुळे विना अडथळा माॅन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आले.
पुढील 2 दिवसांमध्ये माॅन्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या काळात हवामान कोरडे राहणार आहे.
केरळमध्ये वेळेआधीच माॅन्सून
पुढील 48 तासांमध्ये अंदमान निकोबार बेट, अंदमानचा समुद्र आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भागात माॅन्सून व्यापणार आहे. यावेळेस माॅन्सूनचा वेग चांगला असल्याने, यंदा केरळात वेळेआधीच माॅन्सून दाखल होणार आहे व पुढील 4 आठवड्यांतच देशभरामध्ये पावसाला सुरुवात होईल.
जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये अरबी समुद्रावर व यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प व लगतच्या अग्नेय अरबी समुद्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी (दिं. 14) वर्धा मध्ये सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियसची नोंद झाली तर महाबळेश्वर येथे राज्यातील निच्चांकी 29.7 अंश सेल्सियसची कमाल तापमान नोंद झाली. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा 3.5 ने कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे.
मागील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जने सह पाऊस पडला. ढगाळ हवामान व मान्सून पूर्व सरी यामुळे मध्य महाराष्ट्रामधील काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे.
महाराष्ट्रात १७ मे रोजी कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जने सह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी, तसेच लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये १७ व १८ मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.