पाऊस पडल्यावर लाईट का जाते? जाणून घ्या कारण..

वीजपुरवठा अचानक खंडित होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वादळ वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटणाऱ्या तारा किंवा कालांतराने निकामी झालेली चिनी मातीची विद्युत उपकरणे.

चार महिने प्रचंड उष्णता सहन केल्यानंतर प्रत्येक जण पावसाची वाट पाहतो. पण पाऊस येताच सर्वात मोठी समस्या म्हणजे वीज गायब होते. पहिल्या पावसानंतर अनेकांनी वीज गेल्याचा अनुभव घेतला असेल. त्यामुळे पावसाचा आनंद असला तरी वीज गेल्यामुळे मोठी अडचण सहन करावी लागते. पाऊस आल्यानंतर लगेचच वीज का जाते, यानंतर महावितरणचे कर्मचारी काय करतात जाणून घ्या…

पावसाळ्यात वीज गायब होण्याची नेमकी कारणं काय?

महाराष्ट्रात वीजपुरवठा करणारी महावितरण ही एक प्रमुख सरकारी कंपनी आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागासह अनेक मोठ्या शहरांमध्ये देखील वीज गुल होते..

पावसाळ्याच्या सुरुवातीस येणाऱ्या वादळी-वाऱ्यामुळे अथवा जास्त पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे अनेक प्रकार घडत असतात. हेच प्रमाण इतर ऋतूंमध्ये मात्र कमी असते. वीजपुरवठा अचानक खंडित होण्याचे एक महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे वादळ-वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटणाऱ्या तारा अथवा कालांतराने निकामी होत असलेली चिनी मातीची विद्युत उपकरणे. अनेकदा जास्तीचा भार एखाद्या रोहित्रावर आल्यामुळे सुद्धा वीज प्रवाह खंडित होतो. बऱ्याचदा पशु-पक्षांच्या स्पर्शाने अथवा धक्क्याने सुध्दा वीज जाते, तारांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडल्यानेही वीज खंडित होते.

वीज गेल्यावर महावितरणचे कर्मचारी काय करतात ?

वीज गेल्यानंतर घरामधली सर्व विद्युत उपकरणे बंद पडतात आणि मग सर्व राग निघतो तो महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मते, अगदी याच वेळी लाईनमन आणि कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मग तो दिवस असो अथवा रात्र, पाऊस असो अथवा ऊन.

नेमकी तुमच्या भागातली वीज गेल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांना कसं समजतं?

विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारणे विविध आहेत. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याबरोबर नेमका तो कुठे झाला, याचा अंदाज नेहमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येतोच. कारण, दररोज तपासणी आणि टेहाळणी करत असताना लूज काँटॅक्ट, स्पार्किंग, झाडाची फांदी तारांना घासते का, कोणत्या पोलवरील उपकरणे निकामी झालेली आहेत किंवा कमकुवत झालेली आहेत, याचा अंदाज त्या-त्या भागातील लाईनमन आणि त्यांच्या सहाय्यकाना असतो.

जेव्हा जेव्हा विद्युत पुरवठा खंडित होतो, मग तो कोणत्याही कारणामुले होवो, त्याची माहिती लगेच त्या भागातील सबस्टेशनमधील विद्युत नियंत्रण यंत्रावर लगेच कळते. अलार्म वाजायला सुरुवात झाली की नेमकी कोणत्या फीडरवर वीजप्रवाह खंडित झाला याची अचूक माहिती मिळते. सबस्टेशनला रात्र-दिवस नियुक्त असलेले ऑपरेटर मग लगेच त्याची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि त्या-त्या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देतात. नियमाप्रमाणे वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर पाच मिनिटांनी ऑपरेटर सबस्टेशनच्या यंत्रावरून पहिला ट्रायल घेऊन बघतात. त्या नंतरही वीज पुरवठा टिकला नाही तर दुसरा प्रयत्न दहा मिनिटानंतर केला जातो. तरी सुद्धा वीज प्रवाह सुरळीत झाला नाही तर 15 मिनिटांनी शेवटचा प्रयत्न केला जातो. त्या नंतरही विद्युत प्रवाह सुरळीत झाला नाही, तर यंत्र बंद करून याची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित भागातील लाईन स्टाफ यांना दिली जाते.

या नंतर सुरु होते ती नेमकी बिघाड शोधण्याची मोहिम. या मोहिमेमध्ये सबस्टेशनचे बहुतांश कर्मचारी शमील असतात. पहिल्यांदा ब्रेकडाऊन, स्पार्किंग, मोडून पडू शकणारी झाडे, इमारतीचा काही भाग अश्या सर्व त्या शक्यता तपासल्या जातात. वेगाने कामाची तपासणी केली जाते. दुरुस्ती करून लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांमार्फत म केला जातो. हे करत असताना नियमाप्रमाणे देण्यात आलेले साहित्य, संरक्षक वस्तू जसे की हातमोजे, हेल्मेट, बूट या वस्तू महावितरणचे कर्मचारी वापरत असतात.

ग्राहकांसाठी सल्ला काय?

पावसाळा सुरु होण्या पूर्वी विद्युत पुरवठा खंडितच होऊ नये याकरीता हवी ती काळजी घेऊन दुरुस्ती आणि खबरदारी घेण्यात येते. तरी सुद्धा अनेकदा विद्युत पुरवठा हा खंडित होतोच. त्यामुळे विद्युत ग्राहकांनी घरातल्या आपल्या उपकरणांची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय प्रवाह खंडित झाल्यानंतर 30 मिनिटांनी महावितरणच्या संप्रर्क क्रमांकावर (1800 102 3435) संपर्क साधला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!